Posts

Showing posts from July, 2012

कणखर

स्वप्नांच्या मखमली आश्वासनांवर विसंबून उताणी पडलेली रात्र आठवली की काळजात चर्र होतं. कधी काळी याच रात्रीच्या आळोख्या-पीळोख्यांवर जीव ओवाळून टाकला होता. स्वप्नं असतातच जहरी, दिवस-रात्र धडपडणाऱ्या उरातील श्वासास फूस लावून पळवून नेणारी. नशिबाचे वादळी तडाखे बसले आणि नियतीनं दाखवली पाठ की मग येते जाग, मग शोधतात स्वप्नं आसरा, स्वतःच कालवलेल्या विषारी मनात; मग घेता येतो रात्रीच्या केसांतला मोगरी श्वास, आणि होता येतं फुलपाखरांच्या पंखांइतकं कणखर !

लाचार

दिसताच तू प्रिये मी, झालो पिसाट वारा माझ्याच काळजाच्या, उडवूनी लक्तरांना ! प्रेमात यातना का, व्हाव्यात सांग राणी ? हृदयातले उसासे, हृदयास छेदताना ! झाकून पापण्या मी, मिटलो यथावकाश रचना तुझ्या मितीच्या, डोळ्यात नाचताना ! कितीवार पेलले तू, लाचार शब्द माझे दुनियेसमोर त्यांच्या, अन लाज राखताना !

श्रावण

माझ्या अंगणात सये घाली पाऊस फुगडी उंबराच्या पायापाशी गाय थांबेल न थोडी जरा सांगून ये अशी जा वाऱ्याच्या कानात इथे सांग उसळती आगडोम्ब श्रावणात रानी दाटलेलं धुकं माझ्या केसातून वाही दिसे चहूकडे माझा मला श्याम मनमोही  

केसरबाई केरकर

केसरबाई केरकर जेव्हा मल्हार आळवत होत्या माझ्या पणजोबांच्या जुनाट ग्रामोफोनमधून - मी तेव्हा घरातच होतो. तू आलीस भिजून चिंब - तूझ्या कुरळ्या बटेवरून ओघळलो मी गालापर्यंत. गाणं संपलं तेव्हा - शोधलं मी खूप तुला ! मल्हार ऐकणं बहुधा झेपत नसावं मला !

विधान

कॉलनीसमोरील रस्त्यावर फिरताना म्हणाली होतीस - रस्ता संपेल, पण साथ, अं हं ! चौथ्या फेरीनंतर सप्तपदीत सांगितलस ओलसर डोळ्यांनी - प्रेम संपेल, पण मैत्री, अं हं ! आयुष्याच्या उतरणीवरही तू चष्मा पुसत धीर दिलास - जन्म संपला, पण विधान, अं हं !

थेंबांच गीत

तू कूस बदलल्यावर खिडकीतून उडणाऱ्या रसरसलेल्या थेंबात अर्थ कितीसा उरतो ? तू कूस बदलल्यावर झोप रुसून गेलेल्या डोळ्यातील अमावस्येत चंद्र कितीसा उरतो ? तू कूस बदलल्यावर माझ्यातल्या पावसात आणि बरसत्या देहात जन्म कितीसा उरतो ?

वातीचं देणं

फुलपाखरांच्या पंखातून बेमालूमपणे निसटणाऱ्या रंगांचं; इंद्रधनुच्या कुंचल्यातून आभाळ गिरवणाऱ्या हातांचं; चंद्राच्या एका इशाऱ्यावर आसमंतात झेपावणाऱ्या लाटेचं; हृदयाच्या काजळी समईत दिवस-रात्र जळणाऱ्या वातीचं; देणं आहे माझं कित्येक जन्मांचं !

संध्याकाळ

त्याला होती घरटी बांधायची मला भरकटायचच होतं नशिबाच्या कपाळरेषात मला हरवायचच होतं ! त्याला व्हायची सर्दी नुसताच वारा लागून काळ गोठवणाऱ्या नजरेचं माझ्या मलाच कौतुक होतं ! अंधुक अंधुक दिवस आणि कोमेजलेल्या रात्री संध्याकाळच्या उजेडाचं दोघांचही देणं होतं !

मौन

तळ्याकाठी राहिलेलं आपलं मौन रात्री जेव्हा तळ्यात उतरेल ... चांदणवेलीवर चढून थेट आणि माझ्याशी बोलतं होईल तेव्हा तुझा निश्वास वाऱ्याला आंदण देईल फुलता फुलता राहिलेल्या कळ्या-फुलांचे गुज !

होड्या

केल्या होत्या तेव्हा शिडाच्या असंख्य होड्या आता आठवत नाही नेमक्या कधी! कौलांवरून खाली अन चिंचेच्या बाजूने वहायचा मी होड्यातून नदीपर्यंत! पात्र नदीचं मोठं होत जायचं मी लहान होत जायचा होड्या बुडून गेल्यावरही तरंगत राहायचा!